रसग्रहण - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर

मायबोली.कॉम वर नुकतीच रसग्रहण स्पर्धा पार पडली. त्यातली ही माझी प्रवेशिका.
सगळ्या प्रवेशिका इथे पहायला मिळतील. http://www.blogger.com/img/blank.gif

*********************************************************

पुस्तकाचे नावः वास्तव नावाचं झेंगट
लेखक: सुमित खाडिलकर
प्रकाशन संस्था- नविन प्रकशन
प्रथम आवृत्ती- एप्रिल २०१०

वास्तव नावाचं झेंगट

इंग्रजी पुस्तकं किंवा ब्लॉगविश्वावर नजर टाकली तर असं दिसतं की सर्व वयोगटांतली लोकं आपल्या अनुभवांवर आधारित भरभरून लिहीत असतात. नोकरी करणारे, नोकरी न करणारे, विद्यार्थी , प्रवास करणारे, खेळाडू, कलाकार, तंत्रज्ञ असे कुठल्याही क्षेत्रातले असले तरी लिहितात. आपल्याला आलेले अनुभव जमतील तसे जमतील त्या पद्धतीने आणि शक्य असेल त्या माध्यमात लिहितात. मराठीतही अशाप्रकारचं लिखाण वाचायला मिळतं पण त्याचं प्रमाण इंग्रजीपेक्षा बरंच कमी आहे. इतके दिवस लिखाणातली ही 'तरूणाई' थोडीफार पुस्तकं, काही ठरावीक ब्लॉग किंवा इतर माध्यमांमधून कमीअधिक प्रमाणात दिसणार्‍या लेखनापुरतीच मर्यादित होती. पण हल्ली संपादक तसेच प्रकाशकांकडून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे आणि वाचकांकडून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तकं, मासिकं, ब्लॉग, संकेतस्थळं ह्या सगळ्या माध्यमांमध्ये अश्या नविन लेखकांचं प्रमाण वाढायला लागलं आहे.

नुकतच अश्याच एका नविन आणि तरूण लेखकाने, सुमित खाडिलकरने, लिहिलेलं 'वास्तव नावाचं झेंगट' हे पुस्तक वाचलं. लेखक अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण नुकतंच संपवलेला. ह्याचा उल्लेख इथे अशासाठी केला जेणेकरून लेखकाच्या वयोगटाचा आणि त्या अनुषंगाने असणार्‍या अनुभवविश्वाचा थोडाफार अंदाज यावा.
पुस्तकातली दोन प्रकरणे "मी - आम्ही- आमची टीम" आणि "वास्तव नावाचं झेंगट" एका अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची गोष्ट सांगतात. या कथांमधला कथानायक आणि त्याच्या कॉलेजमधले इतर विद्यार्थी एका सांघिक स्पर्धेत भाग घेतात आणि ती स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली विद्यार्थी वयोगटाला साजेशी धडपड, त्यांना आलेले अनुभव तसेच हाती न लागलेलं आणि लागलेलं बरच काही सांगणारी ही गोष्ट. अतिशय उत्स्फूर्त आणि मुख्य म्हणजे कथानायकाच्या वयाला साजेशी लेखनशैली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि त्या प्रवासाचा भाग बनवून टाकते.

ह्यातला कथानायक हा भवानी शिक्षण मंडळाच्या प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल ब्रँचचा विद्यार्थी. परीक्षेनंतरच्या सुट्टीत ठरलेल्या एका कम्पनी व्हिजिटच्या मिटींगसाठी तो कॉलेजला जातो आणि त्यांचे सर तिथे एकदम वेगळाच विषय काढतात. 'एस.ए.इ. इंडिया' ह्या संस्थेतर्फे आयोजित 'ऑल टेरेन व्हेईकल' बनवण्याच्या स्पर्धेबद्दल ते सांगतात. कथानायक आणि त्याचा मित्र त्यात नाव देऊन टाकतात आणि नंतर त्याबद्दल विसरूनही जातात. सुट्टी संपल्यावर कळतं की त्यांच्याशिवाय अजून फक्त दोघांनी ह्या स्पर्धेसाठी नावं दिलेली आहेत. सर आणि हे चार जण ह्या स्पर्धेची कॉलेजमध्ये जोरदार प्रसिद्धी करतात, आपापल्या मित्रांना ह्यात खेचायचा प्रयत्न करतात आणि सरतेशेवटी दुसर्‍या वर्षाची सतरा आणि फक्त बाहेरून मदत करायला तयार झालेली शेवटच्या वर्षाची तीन, अशी एकूण वीस जणं गोळा होतात. ह्यातल्या कोणाला किंवा अगदी सरांनाही गाडी बनवायचा अनुभव सोडाच पण त्याबद्दल फारशी माहितीही नसते. त्यात अगदी शेवटच्या क्षणी असं कळतं की स्पर्धेचे संचालक स्पर्धेपूर्वी इंटरव्ह्यू घेणार आहेत. टीम मधल्या कोणालाच इंटरव्ह्यूला काय विचारणार हे माहीत नसतं किंबहुना काहीही विचारलं तरी सांगता येणार नाहीये ह्याची खात्रीच असते. अश्याच एका गोंधळातल्या मिटींगमध्ये रघुनाथ भावे नावाचा एक मुलगा येऊन स्वतःची ओळख करून देतो आणि पुढे "कुणाला असं वाटतं का, मी कॅप्टन बनू नये, किंवा दुसर्‍या कुणी बनावे?" असा सरळ प्रश्न विचारतो. अर्थातच कोणाकडूनही काहीच उत्तर न आल्याने हा रघुनाथ भावे टीमचा कॅप्टन बनतो आणि तिथून सुरु होते एका ध्यासाची सुरस कथा.

कॉलेजमधल्या टीमच्या संदर्भात जे जे काही घडू शकतं ते सगळं ह्या टीमच्या बाबतीत घडतं. दोन नेत्यांमध्ये मध्ये भांडणं होतात, ज्युनियर पोरांवर सिनियर्स दादागिरी करतात. काही जणं ही दादागिरी सहन करून पाट्या टाकत राहतात पण काही जण मात्र टीम सोडून जातात. सोडून गेलेल्यांपैकी काही जण तो राग मनात ठेऊन ह्या टीमच्या विरुद्ध मोर्चेबांधणी करतात. ह्या सगळ्या प्रकारांमुळे टीम आणि कॉलेजमधले शिक्षक तसच व्यवस्थापन ह्यांचे संबंध बिघडतात. कॉलेज वेळच्या वेळी पैसे तसेच इतर आवश्यक गोष्टी पुरवत नाही. टीममधली मुलं आपल्या पालकांकडून पैसे घेऊन गाडीचं काम पुढे नेतात. अश्या परिस्थितीत पैसे देणार्‍या पण काम न करणार्‍या मुलांशी काम करणार्‍या मुलांना जुळवून घ्यावं लागतं. स्पर्धेच्या सुरुवातीला सगळेच जण भन्नाट कल्पना लढवून डिझाइन करतात पण ते प्रत्यक्षात उतरवणं जवळजवळ अशक्य ठरतं. मग ऐनवेळची धावपळ. त्यात तोंडावर आलेल्या परीक्षा. काही जण एखाददोन पेपर बुडवतात मात्र गाडी चाकांवर पळवायचीच ह्या एका इर्ष्येने पेटून उठतात. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडतो. जे जे शक्य होईल ते ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं जातं मात्र स्वप्न १०० % पूर्ण होतंच नाही. कल्पनांच्या कितीही भरार्‍या मारल्या आणि ध्येयपूर्तीचा कितीही ध्यास घेतला तरी वास्तव नावाचं झेंगट त्यांच्या स्वप्नाच्या आड येतं !
पुढच्या वर्षी टीम नव्या दमाने कामाला लागते. आदल्या वर्षी झालेल्या चुका टाळायची जबाबदारी कथानायक आपल्या खाद्यांवर घेतो, नवे वर्ष, नवी टीम आणि त्यांच्या पुढच्या नव्या समस्या ! फक्त आता गाठीशी असतं एका वर्षाच्या अनुभवाचं पाठबळ आणि आदल्यावर्षीच्या चुका टाळण्याचा निश्चय. टीमचा नविन वर्षातला स्पर्धेच्या दिवसापर्यंतचा प्रवासही अतिशय रंजक आहे. कथानायक म्हणतो, "पहिलं वर्ष स्वप्नवत होतं तर दुसरं वास्तव. या वेळी आम्ही आंधळेपणाने झपाटून नाही तर डोळसपणे कष्ट केले होते. पण त्यामुळेच बहूतेक ह्यावेळी कमी मजा आल्यासारखं वाटतं होतं."

काही काही प्रसंग लेखकाच्या शैलीमुळे तसेच नाट्यमय वर्णनांमुळे आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहातात. पहिल्यांदा गाडी चाकांवर चालवली जाते त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना आपल्यालाही स्फुरण चढतं. स्पर्धेच्या दिवशीची धावपळ, ऐनवेळची कामं आपल्याला तिथल्या वेगवान वातावरणात घेऊन जातात. लेखकाने पुस्तकात सांगितलेते इंजिनीयरिंग कॉलेजमधल्या शिक्षकांबद्दलचे अनुभव तर अगदी वास्तवदर्शी आहेत.
कॉलेजमधल्या शिक्षिकेशी संबंध बिघडलेल्या एका मुलाला लेखी परिक्षेत ७० मार्क मिळतात मात्र कॉलेजमधल्या शिक्षकांच्या हातात असलेल्या त्याच विषयाच्या तोंडी परीक्षेत तो नापास होतो. ह्या प्रसंगाबद्दल लेखक म्हणतो, "लायकी नसताना अधिकार मिळाले तर काय होतं याचं आमच्या मॅडम जिंवत उदाहरण होत्या."
किंवा अनेक वर्ष शिक्षकी पेशातच असलेले आणि बाहेरच्या कॉर्पोरेट जगात काय सुरु आहे ह्याची फारशी कल्पना नसलेले एक सर कथानायकाला टीमचा "मॅनेजर" कसा असावा ह्या बद्दल बरच काही ऐकवतात. ह्या प्रसंगाबद्दल लेखक लिहितो, "सर मला मॅनेजर बनवायच्या दृष्टीने लेक्चर द्यायला लागले. माझा टीशर्ट किंवा वरची एक दोन बटणे उघडी ठेवलेला, बाह्या फोल्ड केलेला शर्ट, जीन्स, सँडल, हातातलं कडं, गळ्यातला गंडा, चेहेर्‍यावरची बेफिकिरी, एवढंच काय पण माझी चालण्याची पद्धतसुद्धा 'त्यांच्या' मॅनेजरच्या श्रेणीत बसणारी नव्हती. त्यांना माझं हसणं सुद्धा मॅनेजरसारखं वाटायचं नाही. ते मला म्हणाले होते हसताना माझे डोळे खूप बारिक होतात. भरपूर मोठं लेक्चर ऐकून मला हसावं की रडावं ते कळेनासं झालं. रोहन मात्र पोट धरून हसत होता." अर्थात पुस्तकातले हे विद्यार्थी फक्त शिक्षकांच्या विरोधातच आहेत असं नाही. तसच या मुलांच्या वयाला अनुसरून असणारा समजुतदारपणा दाखवणारे काही प्रसंगही लेखाकाने भाषेचा बाज न सोडता लिहिले आहेत. एका प्रसंगात लेखक लिहितो, "त्यांना चढलेल्या धुंदीचा हेवा वाटून मलाही क्षणभरासाठी बडवायजरचा मोह झाला, पण मी तो यशस्वीरीत्या आवरला. जवळपासचा काही नातेवाईकांचा इतिहास ह्या बाबतीत चांगला नव्हता आणि तो आठवला की, मला या गोष्टीचा मोह आवरता यायचा. माझ्यासमोर माझ्या आईचा चेहेरा यायचा आणि मग मी असं काही करणं अशक्य व्हायचं. मी दारू प्यायल्याचं आईला नुसतं कळलं, तर तेव्हड्यानंच तिला काही तरी होऊन बसलं असतं."

स्पर्धेबद्दलची कहाणी सांगताना लेखक टीममधल्या मुलांची व्यक्तिचित्रं आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. विषयातली भरपूर आणि अचूक माहिती असलेला, समोरच्यावर छाप पाडण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच स्वभावात उद्दामपणा आलेला टीमचा कॅप्टन रघुनाथ, रघुनाथ इतकीच माहिती असणारा पण आपलं म्हणणं दुसर्‍यासमोर न मांडू शकल्याने मागे पडणारा रोहन, 'वन मॅन आर्मी' असलेला पण मुखदुर्बळ प्रसाद, दोघांच्या भांडणात न बोलून शहाणे ठरणारे कुंटे आणि शेट्टे आणि आपल्या क्षमतांची आणि उणिवांची पुरेपुर जाणीव असणारा आणि एखादी गोष्ट मनापासून कराविशी वाटली की त्यात स्वतःला झोकून देणारा कथानायक हे सगळेच जण आपल्या अवतीभवती कुठे ना कुठे सापडायला लागतात.

ही संपूर्ण कहाणी सांगताना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची मानसिकता लेखकाने अचूकपणे टिपली आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अश्याप्रकारच्या सांघिक स्पर्धांमध्ये भाग न घेतलेल्या वाचकांना
ह्या पुस्तकानिमित्त एक आगळ्या अनुभवविश्वाचं दर्शन होतं तर अश्याप्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले वाचक नकळत "अगदी अगदी !" अशी दाद देऊन जातात. पुस्तकाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यात मांडललेलं सगळं अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याची सतत जाणिव होते आणि म्हणूनच पुस्तक फार जवळच वाटतं आणि आवडून जातं !

ब्लॉगर्स आणि त्यांचे मला आवडलेले ब्लॉग

त्याकाळी, म्हणजे २००५/२००६ साली मराठी ब्लॉगविश्व फारच छोटं होतं. (कदाचित त्यामुळेच ?) खूप छान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. ब्लॉग आवडले तर सांगायचे, नाही आवडले तर ते ही सांगायचे, कोणी थोडे दिवस नाही लिहिलं तर लगेच मेल, कमेंट्स मधून चौकश्या व्हायच्या. तेव्हा आज आहे तितका युनीकोडचा सर्रास वापर सगळ्या ठिकाणी होत नव्हता. ब्लॉग असला तरी त्यावर टाईप करायला बरहा वापरायला लागायचं. मला मराठी ब्लॉगविश्वाचा शोध अचानकच लागला होता. "मासा आणि मासोळी" हे मी तेव्हा वाचलेलं मराठी ब्लॉगवरच पहिलं पोस्ट. नंतर मी रेग्युलरली ब्लॉग्ज वाचायला लागलो. काही काही ब्लॉग्ज अगदी खूप लक्षात राहिले. नंतर ते परत परत वाचले गेले.

मधे एकदा बोलता बोलता विषय निघाला तेव्हा परत काही ब्लॉग पोस्ट शोधून काढले आणि वाचले. पुढच्यावेळी एकेठिकाणी सापडावे म्हणून लिंक्स एकत्र टाकतोय.

१. मराठी ब्लॉगविश्वातला माझा सगळ्यात आवडता ब्लॉग म्हणजे ट्युलिपचा ब्लॉग. ह्यातले बरेच पोस्ट्स माझे अक्षरशः शेकडो वेळा वाचून पाठ झाले आहेत ! त्यातल्या माझ्या आवडत्या काही पोस्टच्या लिंक्स.

- जोशी आणि जोशीण : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/09/blog-post_12.html
- मुंबईतला पाऊस : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post.html
- चारुलता, स्वारोव्स्की आणि सरत्या उन्हाळ्यातली एक संध्याकाळ.. : http://tulipsintwilight.blogspot.com/2007/10/blog-post.html
- पांथविराम उचलण्यापूर्वी : http://tulipsintw
ilight.blogspot.com/2007/05/blog-post.html
- सुंदरबन : Sundarban: http://tulipsintwilight.blogspot.com/2007/04/blog-post.html

२. मी वर म्हंटलं तसं मी वाचलेलं पहिलं पोस्ट (पामरच्या ब्लॉग वरचं) : मासा आणि मासोळी : http://paamar.blogspot.com/2005/09/blog-post.html

३. नंदनच्या 'मराठी साहित्य' ब्लॉगवरचे बरेचसे पोस्ट खूप वाचनीय आहेत. त्यातला सखाराम गटणेवरचा पोस्ट खूप लक्षात राहिला. नंतर तो इमेलवरुनही बराच फिरला होता.
http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html

४. संवेदचा पूर्ण ब्लॉगच खूप सही असतो. अगदी ब्लॉगच्या नावला शोभेल असा !
http://samvedg.blogspot.com/

५. त्या काळी अभिजीत बाठे हा ब्लॉगर खूप अ‍ॅक्टीव असायचा. हल्ली फारसं लिहित नाही बहूतेक तो.
त्याचा 'एक डाव भुताचा' (आयटमच भुत) हा पोस्टपण खूप आवडला होता.
http://abhijitbathe.blogspot.com/2007/03/blog-post.html.

६. गायत्रीचं 'समईच्या शुभ्र कळ्या' गाण्याचं रहग्रहण फार सुंदर आहे. सारेगमप मध्ये जेव्हा जेव्हा हे गाणं सादर झालं तेव्हा मी हे पोस्ट काढून वाचलय. http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html

७. केतन कुलकर्णीचा ब्लॉग पण मला फार आवडायचा. त्याचं लिखाणं खूप ड्रिमी असायचं.
त्यातलं हे एक पोस्ट आणि VOF चं प्रवासवर्णन आवडलं होतं. http://asach-aapla.blogspot.com/2008/08/post-50.html

८. संवादिनीचा ब्लॉग एकदम हलकाफुलका असायचा. त्यातली काही पोस्ट वाचून 'अगदी अगदी' असं म्हणावसं वाटायचं. त्यातले काही लक्षात राहिलेले पोस्ट.
जग्गू : http://samvaadini.blogspot.com/2008/01/blog-post.html
दिल्ली आणि नेलपॉलीश : http://samvaadini.blogspot.com/2008/06/blog-post_19.html
लग्न : http://samvaadini.blogspot.com/2009/01/blog-post_29.html ह्यातलं 'नविन सूनबाईंच विविध गूणदर्शन' वाचून फार हसलो होतो !!

९. विद्या भूतकरचा ब्लॉगही मी फॉलो करायचो. साधा सिंपल छान असायचा. http://vidyabhutkar.blogspot.com/

१०. अभिजीत कुलकर्णीचा ब्लॉगपण सही असायचा. पण त्याने तो आता डिलीट केला की काय माहित नाही. आता सापडत नाहिये. :|

पुढे ब्लॉगविश्वाशी संपर्क थोडा कमी झाला. आता परत ब्लॉग्ज वाचणं सुरु करायचं आहे. सध्याच्या "पिढीतल्या" आपल्या आवडत्या ब्लॉग्जच्या लिंक कोणी इथे टाकल्यास माझी काही हरकत नाही.

स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना...

सध्या मायबोली संकेतस्थळावर महिला दिनाच्या शतकमोहोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत. मुख्य म्हणजे हे कार्यक्रम महिलांपुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांसाठी खुले ठेवले आहेत. ह्यापैकी एका कार्यक्रमात संयोजकांनी सगळ्यांना 'स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना' ह्या विषयावर आपले मनोगत मांडण्याचं आवाहन केलं होतं.
तर मी लिहिलेला परिच्छेद खाली देत आहे....
--------------------------------------------------------------------------------
ह्या विषयावर लिहायला बसल्यावर स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे विषयांबद्दल सर्वप्रथम कधी विचार केला होता हे आठवायचा प्रयत्न करत होतो.
वैयक्तिक पातळीवर बघायला गेलं तर आमच्या घरातल्या सर्वच स्त्रिया फार कर्तबगार आहेत. आज्जीने नाशिक सारख्या ठिकाणी साधारण १९३० च्या आसपास वयाच्या आठ-दहाव्या वर्षी पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन आणि बक्षिसे मिळवून क्रांती घडवली होती. नंतरही आजोबांच्या आजारपणामुळे एकटीने निर्णय घेऊन, पैशांची सोय करून ७० च्या दशकात पुण्यात जमीन घेतली. घरातले सगळे व्यवहार वगैरे तिच बघत असे. माझी आई आमच्या कुटूंबातली पहिली डबल ग्रॅज्युएट सून म्हणून आज्जीला तिचे फार कौतुक. आईनेही २२ वर्ष नोकरी करून बाबांच्या बरोबरीने किंवा थोडेफार जास्तच सगळे व्यवहार संभाळणे, महत्त्वाचे निर्णय घेणे वगैरे सगळं केलं. पुढे वहीनी आणि माझी बायको ह्या मार्कांनुसार, मिळवलेली बक्षिसे, sincerity वगैरेंनुसार आमच्यापेक्षा जास्त हुषार आहेत असं कौतुक माझी आई करत असते आणि त्या दोघींचाही घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थातच पूर्ण सहभाग असतो. त्यामुळे घरातल्या स्त्रियांकडे बघता त्यांना कधी 'मुक्ती' वगैरेची गरज आहे असं वाटलच नाही (hopefully !) आणि आजुबाजूचं जग बघेपर्यंत ह्याची कधी जाणिवच झाली नाही. घरातल्या स्त्रियांना कधी त्रास झाला नसेल असं नाही (म्हणजे घरी लवकर ये, परिक्षा आहे तर बाहेर नको जाऊ, घरात आजारपण आहे तर दांडी मार वगैरे हे फक्त आईला किंवा आज्जीलाच सांगितलं गेलं, बाबांना नाही) पण त्या स्त्रिया आहेत म्हणून तो झाला ह्यापेक्षा हक्काच्या भावनेतून तो झाला असावा असं मला वाटतं.

नंतर खटकलेली अगदी जवळची तीन उदाहरणं आठवली. एकामध्ये सासरच्या अतिधार्मिक वातावरणामुळे मुळात तसा स्वभाव नसतानाही आयुष्यभर करावी लागणारी तडजोड होती. दुसर्‍यामध्ये दोन्ही मुली झाल्या म्हणून आयुष्यभर सासूने टोमणे मारणे, कुजकट बोलणे हे प्रकार होते. तर तिसर्‍यामध्ये सुनेने साडीच नेसली पाहिजे, असच वागलं पाहिजे, तसच केलं पाहिजे वगैरे गोष्टी होत्या. ह्या तीनही उदाहरणांचा विचार करताना वाटलं की मला ह्यांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतय. पण त्यांना तसं वाटतय का ? त्यांना आपल्यावर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव आहे का? पाहिल्या दोन्ही उदाहरणांमधल्या स्त्रिया ह्या अत्ताच्या काळातल्या, भरपूर शिकलेल्या, उत्तम नोकरी करणार्‍या अश्या आहेत. पण जर सासरी असणार्‍या इतर काही चांगल्या गोष्टींमुळे अन्यायाची जाणीव असूनही त्यांना हा अन्याय दुय्यम वाटत असेल आणि त्यांची तडजोडीची तयारी असेल तर 'मुक्ती' मुळात हवी का?
हा सगळा विचार करायला लागल्यावर स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय ह्याबद्दलच डोक्यात गोंधळ झाला !
स्त्रियांची मुक्ती नक्की कोणापासून करायची ? पुरुषांपासून, इतर स्त्रियांपासून, संपूर्ण समाजापासून की अजून कश्यापासून ? म्हंटलं तर ह्या सगळ्यांपासूनच, म्हंटलं तर कश्यापासूनच नाही.

स्त्रीमुक्ती झाली असं नक्की कधी म्हणायचं ?
- अन्याय होत असेल तर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव होण्याइतपत जागरुकता समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये आलेली असेल. जेणेकरून होण्यार्‍या अन्यायाचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जाईल आणि कुठलीच जाचक गोष्ट परंपरा म्हणून सुरु होणार नाही.
- नैसर्गिक वेगळेपण वगळता बाकी कोणतीही लेबलं न लावता स्त्रीला सर्वसाधारण माणूस म्हणून वागवलं जाईल. स्त्री आहे म्हणून अन्याय होणार नाही किंवा स्त्री आहे म्हणून वेगळे मानसन्मान मिळणार नाहीत.
तसच ज्या कारणासाठी स्त्री आणि पुरूष ही नैसर्गिक रचना आहे ते कारण वगळता इतर गोष्टीत एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष ह्यांने फरक पडणार नाही.
- स्त्रियांच्या स्त्रीत्त्वाचा वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांकडून वापर केला जाणार नाही (शारीरीक/मानसिक त्रास देणे, स्त्री आहे म्हणून संधी नाकारणे, पगार कमी देणे इत्यादी) किंवा स्त्री स्वत:ही तसा वापर करणार नाही ('कॉर्पोरेट' पिक्चरमध्ये बिपाशा बासू जे करते त्यासारखं काही, घरातल्या जबाबदार्‍यांची खोटी कारणे सांगून काम टाळणे, emotional blackmailing सारखे प्रकार इत्यादी ).
- मुलगी झाली म्हणून घरात दु:ख होणार नाही किंवा उलट टोक म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस केले जाणार नाहीत.
- समाजातले पुरुष आणि स्त्रियांमधले प्रमाण निसर्गाद्वारे ठरवले जाईल, त्यात माणसाची ढवळाढवळ असणार नाही.
- संयुक्ता सारखे वेगळे गट स्थापन करायची, स्त्री मुक्ती वर लिखाण करायची, त्यासाठी आंदोलने करायची गरज पडणार नाही.

हे साध्य होणं ही एका दिवसातली गोष्ट नक्कीच नाही. कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल ते वेगवेगळ्या संस्था करतच आहेत. पण मुळात mentality बदलण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी जे शक्य होईल प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. समाजप्रबोधन आणि घरातले संस्कार ह्या सगळ्यातल्या मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि थोडेफार सकारात्मक बदल हे येणार्‍या पिढ्यांमध्ये दिसतच आहेत. मुलांच्या समोर "पोरीचं/बायकांचं असच असतं.. त्यांना काही झेपत नाही.. त्यांच्याशी कसही वागलं तरी काय फरक पडतो" वगैरे वाक्य किंवा मुलींना "मुलीच्या जातीला हे असलं शोभत नाही.." वगैरे फंडे देणं लहानपणापासूनच टाळलं पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येकाचाच व्यक्ती म्हणून आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे.

वीस वर्षापूर्वी घरातल्या भांडीवाल्या बाईचे जे प्रश्न होते तेच आजही आहेत ! आणि हे बदलणं शिक्षण समाजातल्या तळागाळात पोचलं तरच शक्य होऊ शकेल. वैयक्तिक पातळीवर आपण जे शिकतो, आचरतो ते अगदी प्रत्येकाने, प्रसंगी इतरांचा विरोध पत्करून, थोडाफार धोकाही पत्करून सार्वजनिक जिवनातही आचरणात आणले तर परिस्थितीत नक्कीच लवकर फरक पडेल.