जिंदगी "गुलझार" है!

आमचं व्हॅंकुअरला यायचं ठरल्यापासूनच इथे आल्यावर काय काय करायचं, कुठे कुठे जायचं ह्याविषयीची ठरवाठरवी करणं सुरू झालं होतं. तेव्हाच दरम्यान स्वरदाकडून समजलं की त्यांचा गाण्याचा कार्यक्रम व्हॅंकुअरला ठरतो आहे आणि ह्यावेळी गुलझारांच्या गाण्यांचा आहे. नीश एंटरटेनमेंटतर्फे वेगवेगळ्या विषयांवरचे सांगितीक कार्यक्रम सादर केले जातात, त्याच प्रकारचा कार्यक्रम असेल असं आम्हांला वाटलं पण जसा त्यांच्या अमेरिका दौरा सुरू झाला आणि फेसबूकवर अपडेट यायला लागले तेव्हा कळलं की हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, 'गुलझार - एक एहसास' असं ह्या कार्यक्रमाचं नाव असून 'नीश'चे कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत असं समजलं. ह्यावेळी गुलझार साहेब स्वतःही येणार आहेत. त्यांच्याशी गप्पा, शेरोशायरी आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्यांची मैफिल असं काहीसं कार्यक्रमाच स्वरूप असणार आहे!  भारतातून इथे येणार्‍या कलाकारांच्या विशेषतः मराठी कलाकरांच्या कार्यक्रमांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर ते इथे यायचं कमी किंवा बंद करतील, त्यामुळे तसं होऊ न देण्याला तेव्हडाच आपला हातभार म्हणून अश्या कार्यक्रमांना तसच नाटकं, सिनेमे इथे येतात त्यांच्या प्रयोगांना आम्ही एकानेतरी जायचा प्रयत्न करतो. त्यातून नीश एंटरटेनमेंटचे कार्यक्रम तर नेहमीच दर्जेदार असतात त्यामुळे त्यातली कलाकार मंडळी आणि ती ही नात्यातली / चांगल्या ओळखीची, त्यामुळे आम्ही आमची तिकीटं काढली होतीच पण गुलझार साहेब स्वतः येणार आहेत हे कळल्यावर उत्साहं अजूनच वाढला.

स्वरदा आणि टीम कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी व्हॅंकुअरला पोहोचणार होती. त्यामुळे ते परस्पर थिएटरलाच जाणार होते. शिल्पाने स्वरदाला फोन करून विचारलं की तुमच्या टीमसाठी काही खायला प्यायला आणायचं आहे का? त्या त्या शहरातले संयोजक तशी सोय करतातच पण तरीही मोठ्या दौर्‍यात घरचं खाणं आणि त्यातही विशेषत: आपला उ़कळलेला चहा ह्याची आठवण होते.  स्वरदानेही चहा नक्की आण, खायचं काय ते कळवते असं सांगितलं. थोड्यावेळाने फोन आला की टीमशी बोलत असताना गुलजार साहेब म्हणाले की घरून काही आणणार असतील तर त्यांना पोहे आणायला सांग, मला महाराष्ट्रीयन पोहे खूप आवडतात. नंतर तिचा पुन्हा मेसेज आला की खूप पोहे आण असं टीम म्हणते आहे! बाकी मंडळी ओळखीची घरची होती, पण साक्षात गुलजारांसाठी पोहे न्यायचे म्हणजे मोठच काम. शिवाय क्वांटीटी वाढली की क्वालीटीचा भरोसा नाही. त्यामुळे शिल्पा आणि आईला पोह्यांचं एकदम टेन्शनच आलं. शिवाय गुलजार साहेब स्वतः भेटणार तर त्यांच्याशी बोलायचं काय हा अजून एक प्रश्न. कारण आपल्या हिंदीचा आनंद आणि कविता/गजलांची समज ह्याचा तर त्याहूनही आनंद! त्यामुळे मी विकीवर वाचायला सुरुवात केली आणि कार्यक्रम आधी पाहून आलेल्या आणि कविता-गझलांमधल्या तज्ज्ञ आणि गुजझार फॅन असलेल्या माझ्या एका मैत्रिणीला पिंग केलं. एकीकडे पोहे तयार होत होते. चहासाठी थर्मास काढला, काहीतरी गोड हवं म्हणून इथल्या स्पेशल मेपल कुकीज आणल्या. सगळं पॅक केलं आणि आम्ही कार्यक्रमाच्या तब्बल तीन तास आधी घरून निघालो (एरवी असतं तर कदाचित पहीलं गाणं बुडलं असतं!!).

थिएटरमध्ये पोहोचलो तर फक्त मिलिंद ओक आणि तेजस देवधर दोघेच जणं आले होते. बाकी मंडळी एअरपोर्टवरून हॉटेलला गेली होती. तेजस आणि ओक सरांचा सेटअप तसेच साऊंड चेक सुरू होता. त्यांच्याशी अधेमधे बोलणं सुरू असतानाच स्वरदा आणि बाकीची टीम म्हणजे गायक जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे आणि स्थानिक संयोजक मंडळीही  आली. गुलझार साहेब आणि कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेणार्‍या रक्षंदा जलिल अजून आल्या नव्हत्या. सगळ्यांनी चहा, खाणं सुरू केलं, ग्रीन रूममध्ये गप्पा टप्पा, एकीकडे त्यांची तयारी सुरू असतानाच थिएटरमधल्या मंडळींनी गुलझार साहेबांची गाडी येऊन पोहोचल्याचं सांगितलं. त्यांना बसण्यासाठी ग्रीनरूमच्या मध्यावर असलेली जागा तयार केली होती. तिथे चांगले सोफे, चांगल्या कपबश्या, प्लेट वगैरे मांडणी होती. आणि गुलझार साहेब आणि रक्षंदा बाईंनी ग्रीन रूममध्ये प्रवेश केला. पांढरा शुभ्र लखनवी कुर्ता पायजमा, त्यावर पांघरलेली शाल, चष्मा आणि चेहेर्‍यावर दिसणारं कलेचं तेज.. असच तेज कलेची आयुष्यभर उपासना करणार्‍या किशोरी आमोणकर, लतादिदी, आशाताई ह्यांच्या चेहर्‍यांवरही जाणवतं. ८६ वय असूनही स्वतःच स्वतः ताठ चालणं, सुस्पष्ट बोलणं आणि रुबाबदार पण तितकच अतिशय डाऊन टू अर्थ, समोरच्याला आपलसं करून टाकणार व्यक्तिमत्त्व. आल्यावर ते दोघेही बाहेरच्या सोफ्यांवर न बसता थेट खोलीत येऊन आम्ही बसलो होतो तिथे येऊन आमच्या बरोबर साध्या खुर्च्यांवरच बसले. सगळ्यांची विचारपूर केली. स्वरदाने आमची ओळख करून दिल्यावर आमचीही चौकशी केली. मला खरतर कोणालाही पटकन नमस्कार करायचं लक्षात येत नाही पण गुलजार साहेबांना मात्र उत्स्फूर्तपणे वाकून नमस्कार केला गेला. गुलजार साहेब मला बस म्हणाले पण खरतर त्यावेळी काहीच सुचत नसल्याने मी नुसताच तिकडे उभा होतो. शिल्पाने दरम्यान त्यांना पोहे दिले. तर ते पुन्हा एकदा "बैठो बेटा, खडे मत रेहेना" म्हणाले.  आणि मला अचानक उर्दू मिश्रीत हिंदी बोलायचा अ‍ॅटॅक आला! मी त्यांना म्हटलं, आपके सामने बैठने की हम जुर्र्त नही कर सकते..  (मनातल्या मनात कपाळाला हात लावला!) आता बोलून तर बसलो होतो, बरोबर आहे नाही माहीत नाही. त्यावर ते म्हणाले, "नही बेटा इतनी तकल्लूफ ना करो". आता तकल्लूफ म्हणजे काय हे अर्थातच मला माहीत नसल्याने नक्की काय करायचं नाही हे न कळून मी चुपचाप शेजारच्या खुर्चीत जाऊन बसलो. (माझी ती मैत्रिण म्हणाली होती की उर्दू contagious असते. ते खरं होतं म्हणायचं.). दरम्यान रक्षंदा बाई काही काही बोलत / विचारत होत्या. मधेच त्या म्हणाल्या, "अच्छा तो आप स्वरदा के ननंदोई हो इसलिये यहा आये हो ?" आता पुन्हा ननंदोई म्हणजे काय ते कळायला काही सेकंद गेले. पण मी हो म्हणून टाकलं. अर्थ लागल्यावर म्हटलं तश्या बर्‍याच ओळखी आहेत आमच्या ! ओक सरांना बरेच वर्ष ओळखतोय, स्वरदा माझ्या मित्राच्या मित्राची बहीण म्हणून आधीपासून माहीत होती, शिवाय तो तेजस माझ्या बहीणीचा मित्र आहे.. फक्त बायकोच्या माहेरची ओळख नाही कै! अर्थात हे सगळं मनातल्या मनात!! त्यांनी उर्दूमिश्र हिंदीत अजून काही विचारलं असतं तर काय घ्या? दरम्यान गुलझार साहेबांना तुमची गाणी खूप आवडतात, अनेक वर्ष ऐकत आलो आहे, वगैरे ठरवलेल्या गोष्टी सांगितल्या. मेरा कुछ सामानची गोष्ट तुमच्या तोंडून प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकायला मिळेल ना असं विचारलं. त्यावर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. नंतर त्यांनी पोह्यात कलौंजी घातली आहे का? चहात मसाला घातला आहे का? वगैरे एकदम घरगुती प्रश्न विचारले. शिल्पाने सरसो आहे सांगितल्यावर रक्षंदा बाईंनी हे सरसो नाही, ही राई, सरसो म्हणजे राईची मोठी बहीण अशी माहिती दिली. पुन्हा मघाचचाच विचार करून हो म्हणून गप्प बसलो. गुलझार साहेबांनी सगळ्यांना तुम्ही खाल्लं का? चहा घेतला का वगैरे चौकशी केली. ह्या मोठ्या लोकांना आपण त्या ग्लॅमरमधून बघतो पण अर्थात ती घरात साधी माणासच असतात. गुलझार साहेबांना भेटून तर हे फार जाणवलं. थोड्यावेळाने स्टेज तयार आहे, इथले फोटो काढून झाले की कार्यक्रम सुरू करू असं संयोजक सांगायला आले आणि मग सगळ्यांना शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर गेलो. स्वरदा, जितेंद्र ह्यांना मी आधी भेटलेलो होतो पण ऋषिकेश रानडेला मी पाहिल्यांदाच भेटलो, तो पण सध्याचा प्रसिद्ध गायक आहे त्यामुळे एकदम सेलिब्रिटी आहे. सुरूवातीला मला त्याच्याशी बोलताना जरा फॉर्मल वाटत होतं. पण गुलझार साहेब आल्यावर आणि त्यांच्याशी एकदम घरगुती स्वरूपातलं बोलणं झाल्यावर  ऋषिकेश एकदम आपल्यातला, घरचाच वाटायला लागला!

कार्यक्रमाच्या सुरूवातीला रक्षंदा जलिल आणि गुलझार साहेब ह्यांची ओळख करून देणारा लहानसा व्हिडीयो दाखवला गेला आणि मग एका क्षणी गुलझार साहेब स्टेजवर आले. टाळ्यांच्या कडकडात संपूर्ण सभागृह उभं राहिलं. त्यांनी स्वागताचा नम्रपणे स्विकार केला पण कडकडाट काही थांबेना. नंतर तर अनेकदा असा कडकडाट होत होता. स्वरदा आणि जितेंद्र ह्यांचं 'नाम गुम जाएगा' अतिशय सुरेख झालं. नंतरच्या मुलाखतीतही गुलझार साहेब अगदी धिरगंभीर वगैरे नव्हते. रक्षंदा बाईंनी विचारलेल्या एका प्रश्नावर म्हणाले, "कुठल्या 'सफर' बद्दल सांगू? उर्दूतल्या की इंग्रजीतल्या!?' मग पुढे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं, चित्रपटात नसेलेली शेरो शायरी सादर केली.

गीतकारांना मुलाखतीत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "शब्द आधी की चाल आधी?" रक्षंदाबाईंनी तो विचारलाच, शिवाय पुढे म्हणाल्या की तयार चालीवर शब्द लिहायचे म्हणजे तयार कबरीत फिट बसणार्‍या मापाचे मुडदे पाडण्यासारखं नाही का? मुख्य प्रश्नाचं उत्तर देण्याआधी गुलझार साहेब म्हणाले की मी लिहिलेले शब्द मग ते चालीवर असो किंवा चालीआधी, ते मला मुडद्यांसारखे मुळीच वाटत नाहीत! ते जिवंत असतात. स्वतःचा कामाबद्दलचा हा विश्वासच ह्या मंडळींना थोर करून जातो. त्यानंतर त्यांच्या पहिल्या गाण्याची गोष्ट सांगितली. ते गाणही चालीवर लिहिलं गेलं. आधी चाल मग शब्द. स्वरदाने 'मेरा गोरा अंग लै ले, मोहें शाम रंग दै दे' हे गाणं ही खूप छान गायलं.

पुढे, उर्दू भाषा आता फार बदलली आहे का ? कालबाह्य होत आहे का? "पूर्वीची उर्दू राहिली नाही" असं वाटतं का? ह्या प्रश्नावर त्यांनी भाषा .. कुठलीही.. आणि तिचं प्रवाहीपण ह्याबद्दल अतिशय सुरेख विवेचन केलं. कुठलीही भाषा ही समाजाची असते, लोकांची असते त्यामुळे समाज जसा बदलतो तशी भाषा बदलणार आणि बदलायलाच हवी, त्यात धर्म, जात वगैरे काही नसतं. एखाद्याला एखादी भाषा आली (किंवा नुसती समजली) म्हणजे ती त्याची झाली. भाषा कधीच मृत होत नाही. आजची हिंदी, आजची गुजराथी, आजची मराठी ही ५०-७० वर्षांपूर्वी बोलली जायची तशीच राहिली आहे का? मग उर्दू कडूनच ती अपेक्षा का? शिवाय भारतात उर्दू अधिकृत भाषा असणारं फक्त एक १ राज्य आहे. त्यामुळे ही खरं म्हणजे लोकांची समजाची भाषा आहे आणि त्यामुळे समाजाच्या बदलाचं प्रतिबिंब भाषेवर पडणारच. त्यात वावगं काही नाही.

रक्षंदा बाईंनी ' हम सब आपके 'अफेअर' के बारे मै जानना चाहते है' अशी गुगली टाकून 'गालिब'च्या विषयाला हात घातला. ८० च्या दशकात दुरदर्शन वर सादर झालेल्या कार्यक्रमाच्या अनेक मनोरजंक आठवणी  गुलझार साहेबांनी सांगितल्या. नसरूद्दिन शहाच का? ह्यावर ते म्हणाले दिग्दर्शक नकोच म्हणत होता कारण तो फार पैसे मागतो ! मग त्याला बोलावलं चर्चेला आणि सांगितलं की बाकीही काही कलाकार बघतो आहोत तर तू पैसे कमी कर. त्यावर नसरूद्दीन भडकला. पैसे कमी न करता शेवटी त्यानेच काम केलं आणि आज गालिब म्हंटलं की लोकांना त्याचाच चेहरा आठवतो!  पुढे गालिबच्या शायरीबद्दलचे बरेच बारकावे उलगडून सांगितले. पुढे चर्चेत 'मेरा कुछ सामान'चा सुप्रसिद्ध किस्सा आला. गुलझारांनी लिहिलेले शब्द वाचून एसडी बर्मन म्हणाले 'आज हे लिहिलत, उद्या टाईम्स ऑफ इंडीया घेऊन याल आणि त्याला चाल लावा म्हणाल!' अखेर बर्‍याच चर्चेनंतर गुलझार साहेबांनीही चाल लावायच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन ते अजोड गाणं तयार झालं. त्याही गाण्याला स्वरदाचा आवाज अफाट लागला होता!

कार्यक्रम शेवटाकडे येत असताना "नज्म के बिना मै नंगा हू" ह्यावरून सुरू झालेली शायरी, लोक  अक्षरशः प्रत्येक शब्दाला टाळ्या वाजवत होते. पुढे 'अजनबी'ची कथा शायरीतून सांगताना 'एक अजनबी को एक बार कहीसे आवाज देना था...' असं म्हणून अलगद 'दिलसे' कडे घेऊन गेले. मला स्वतःला ते 'दिल से' च्या गाण्यांबद्दल काय बोलतात ह्याबद्दल फार उत्सुकता होती कारण 'दिल से'च्या प्रदर्शनपूर्व जाहिरातींमध्ये मणीरत्नम, ए. आर. रेहेमान, गुलझार, शहारूख खान, लता मंगेशकर अशी त्या काळातली यशाच्या शिरखावर असलेली मंडळी एकत्र येणार आहेत ह्या बाबीवर खूप भर दिला होता. गुलझार साहेबांबद्दल माहीती होऊन, त्यांचा फॅन मी तेव्हा पासून झालो.  ते चित्रपटातल्या गाण्यांबद्द्ल काही बोलले नाहीत पण ह्या चित्रपटातलं 'ए अजनबी' हे अजरामर गाणं ऋषिकेश रानडेने आपल्या स्वतःच्या शैलीत सादर केलं.  

गुलझार साहेबांना उर्दू भाषेबद्दल जबरदस्त ओढा आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाचा शेवटही भाषेबद्दलच्या शायरीनेच केला. पुढे प्रेक्षकांनी समाधान न झाल्याचं सांगितल्याने आणखी काही शायरी सादर करण्याची विनंती केल्यावर 'किताबे' आणि 'उर्दू नज्म' ह्या रचना सादर केल्या. कानावर पडत होतं ते सगळच समजत नव्हत आणि त्यावेळी गझला, कवितांमध्ये जरातरी गती असायला हवी होती अशी तीव्र जाणीव होऊन गेली. कार्यक्रमाचा शेवट गायकांनी सादर केलेल्या मेडलेने झाला. सगळीच गाणी सुरेल झाली आणि ती ऐकताना गुलझारांच्या लेखणीच्या कक्षा किती रूंद आहेत हे ही जाणवलं. 'नाम गुम जाएगा' आणि 'मेरा कुछ सामान' लिहिणारी व्यक्तीच 'बिडी जलायले'ही लिहू शकते हे पाहून थक्क व्हायला होतं.

मागे अनपेक्षितपणे सचिन तेंडूलकर भेटला होता, आता गुलझारसाहेब भेटले.  अतिशय भिन्न क्षेत्रातल्या, भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती पण दोन्ही वेळी आलेलं 'हाय' फिलींग मात्र अगदी सारखं होतं!