मॅनहंट

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर अल्पावधीतच अमेरिकेने दहशतवादाविरोधी कारवाया सुरु केल्या. नंतर हाती आलेल्या माहितीनुसार 'अल-कायदा' ही संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बीन लादेन ह्यांचा ह्या हल्ल्यामागे हात होता आणि त्यामुळे ते अमेरिकेचे प्रमुख शत्रू बनले. बीन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडलं आणि अखेर मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सिल्सच्या पथकाने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला. 'मॅनहंट - /११ ते ॅबटाबाद' ह्या पिटर बर्गन लिखित आणि रवी आमले अनुवादित पुस्तकात ह्या १० वर्षांच्या शोधकथेचा थरार आपल्या सामोर उलगडतो
पीटर बर्गन हे टीव्ही पत्रकार आणि लेखक. तसंच वॉशिंग्टन डीसीमधल्या न्यू अमेरिका फाऊंडेशनच्या 'नॅशनल सिक्युरिटी स्टडीज' प्रोग्रॅमचे डिरेक्टर. हार्वर्ड आणि जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठात सहाय्यक अध्यापक म्हणूनही काम केलं आहे. /११ च्या सुमारे चार वर्ष आधी त्यांनी सिएनएन ह्या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानातल्या पर्वतराजीत जाऊन बीन लादेनची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना लादेन 'क्रांतीकारक' वगैरे वाटता अमेरिकेबद्दल द्वेष व्यक्त करणारा एखादा मुल्ला वाटला होता. अमेरिकेविरुद्धचा जिहाद लादेननं वेळोवेळी चित्रफितींद्वारे व्यक्त केला होता आणि पुढे /११ ला अमेरिकेवर हल्ला झाला.  /११ च्या हल्ल्यापासूनच एकप्रकारे बर्गन ह्या पुस्तकाची तयारी करत होते कारण अमेरिका ह्या हल्ल्यामागच्या सुत्रधाराला शोधून ठार मारणार ह्याबद्दल त्यांना खात्री होती. पुस्तक लिहिण्यासाठी आवश्यक ते संदर्भ, कागदपत्रे, व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी इतकच नव्हे ॅबटाबादच्या ज्या घरात लादेन मेला तिथे जाण्याची परवानगी हे सर्व त्यांना मिळालं आणि साकार झाला एक थरार!
पुस्तकाची सुरुवात होते ती 'सुखद निवृत्ती' ह्या प्रस्तावनेपासून. ह्यात ॅबटाबाद शहराचं वर्णन तसच लादेनच्या कुटूंबाची माहिती येते. लादेनच्या बायकांच उच्चविद्याविभुषीत असणं आणि तरीही धार्मिक असणं आणि लादेनच्या 'जिहाद' वर विश्वास असणं हे पाहून आश्चर्य वाटतं! ॅबटाबादमधल्या लादेनच्या घराबद्दलही सविस्तर माहिती ह्या प्रकरणात आहे.
नंतर /११ चा बराचसा माहिती असलेला भाग आणि तोरा-बोराच्या लढाईचा भाग येतो. तोरा-बोराच्या लढाईत अमेरिकेचे आडाखे चुकले आणि लादेन निसटला. ह्यानंतर अनेक दिवस लादेनचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यात इराकचं युद्ध सुरु झालं आणि लादेनच्या शोधाला आणखी विलंब होऊ लागला. 'सिआयए' मधल्या तसचं इतर युनिट्समधल्या लादेन मोहिमेवर काम करणार्या लोकांच्या कथा पुढील भागात सांगितलेल्या दिसतात.
२००७-०८ च्या सुमारास लादेन पाकिस्तानात असेल असा अंदाज अमेरिकेला आला होता आणि तो डोंगराळ भागाऐवजी कुठल्यातरी शहरात असेल असाही संशय बळावत चालला होता. त्याच्याकडून येणार्या चित्रफिती किती वेळात एखाद्या ठिकाणी पोहोचतात, मागे काय दिसतं, कसले आवाज येतात अश्या गोष्टींवरून लादेनच्या ठिकाणाचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न केले जात असत. ॅबटाबादच्या त्या घरात लादेनच आहे ह्याची हळूहळू खात्री होत चालली होती पण तरीही तोरा बोरा सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून राष्ट्राध्यक्ष ओबामा ह्यांना शक्य ती सगळी तयारी करायची होती आणि काळजी घ्यायची होती. लादेन ॅबटाबादच्या घराबाहेर कधीच पडत नसे, इतकच काय तो उपग्रहांच्या नजरेस येऊ नये म्हणून खुल्या आकाशात येणंही टाळत असे आणि अंगणात ताडपत्रीचं छप्पर असलेल्या भागातच संध्याकाळी फेर्या मारत असे. ॅबटाबादच्या घरात रहाणार्या लादेनच्या कुटूंबातल्या काही जणांनाही लादेन तिथे आहे हे माहित नव्हते. घरात रहाणार्या लोकांसाठी भाजीपाला आतच पिकवला जात असे तसच कचर्याची विल्हेवाटही आतच लावली जात असे. एकंदरीत बाहेरच्या जगाशी संबंध शक्य होईल तितका टाळण्याकडेच ह्या कुटूंबाचा कल असे. ह्या सगळ्यामुळे लादेन त्या घरात असण्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळणं जवळजवळ अशक्य होतं आणि म्हणूनच 'लादेन तिथे असण्याची शक्यता किती?' या प्रश्नाला ओबामांना  प्रत्येक सहकार्याकडून वेगळे उतर (६०%, ८०%, ९०%) मिळत असे!
अखेर कारवाई करायची वेळ आली त्यावेळी नेव्ही सिल्सचे पथक वापरायचे ठरले. पुस्तकात ह्या नेव्ही सिल्सची निवड कशी केली जाते, त्यांना प्रशिक्षण कसे दिले जाते आणि ह्या मोहिमेवर जाणार्या पथकाने तयारी आणि सराव कसा केला ह्याची रंजक माहिती येते.
प्रत्यक्ष कारवाईचे तसेच उत्तरक्रियेचे वर्णन एखाद्या थरारपटाला साजेसे आहे. लादेनला मारायची मोहिम अमेरिकेने पाकिस्तान सरकार तसेच लष्कर ह्यांना पूर्ण अंधारात ठेऊन केली. त्यामुळे लादेनला ठार मारल्यानंतर पाकिस्तानबरोबरचे संबंध कसे हाताळायचे ह्याबद्दलही ओबामांनी खूप तयारी केली होती. लादेननंतरच्या अल-कायदाच्या परिस्थिती बद्दल तसेच भवितव्याबद्दलची माहिती पुस्तकातल्या शेवटच्या प्रकरणात येते.
पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी फोटो तसच नकाशे समाविष्ट केलेले आहेत. तसच आवश्यक ती संभाषणे सविस्तर दिलेली आहेत. विषय संवेदनशील असल्याने लिहिल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीची १००% खात्री करण्यासाठी लेखकाने अनेक संदर्भ वापरलेले होते तसेच अनेकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या. ह्या सगळ्या संदर्भांची सुची तसेच ऋणनिर्देश सुमारे १०० पाने व्यापतील इतकी मोठी आहे!
अनुवादकार रवी आमले ह्यांनी भाषेचा बाज उत्तम संभाळला आहे. कुठेही बदलेल्या भाषेमुळे रसभंग होत नाही. तसच काही महत्त्वाच्या संभाषणामध्ये इंग्रजीतली वाक्य दिलेली आहेत जी अगदी योग्य भाव वाचकांपर्यंत पोहोचवायला मदत करतात. माझ्या दृष्टीने 'आवर्जुन वाचलेच पाहिजे' असे हे पुस्तक आहे!

-------------------------------------------------------------------------------------------------
हा पुस्तक परिचय महाराष्ट्र टाईम्सच्या ३० मार्च २०१४च्या 'संवाद' पुरवणीत प्रसिद्ध झाला.